जुन्नर : नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीत विवाहोच्छुक तरुणांची एकाच महिलेने दोन तरुणांशी लग्न लावून तसेच त्यांची आर्थिक फसवणूक करून नवरी पळून गेल्या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्याने नारायणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक 226/ 23 भादवि कलम 420, 406, 34 याप्रमाणे तक्रार दाखल करण्यात आलेली होती.
सदरची टोळी आणखी काही तरुणांची अशाच प्रकारे लग्न करून फसवणूक करण्याचे तयारीत असल्याचे तक्रारदार यांचे कडून समजले. त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपासाचे दृष्टीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे पोलीस ठाणे प्रभारी पृथ्वीराज ताटे यांनी सदरचा गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे यांच्याकडे सोपविला. व गुन्हयाचा तांत्रिक अभ्यास करून तत्काळ पो उप निरीक्षक धुर्वे तसेच पोलीस पथक यांना तपासकामी रवाना केले.
तपास देण्यात आल्यानंतर बनावट लग्न लाऊन फसवणूक करणाऱ्या टोळीने अशा पद्धतीने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्याचा तपास करून खालील प्रमाणे आरोपी अटक करून बनावट लग्न लावून देणाऱ्या आरोपींचे रॅकेट ताब्यात घेण्यात आले आहे.
यामध्ये जयश्री काळू घोटाळे वय. 35 वर्षे राहणार मुरंबी शिरजगाव तालुका त्रंबकेश्वर नाशिक; मीरा बंसी विसलकर वय 39 वर्षे राहणार अंबुजा वाडी इगतपुरी घोटी नाशिक; तुकाराम भाऊराव मांगते वय 23 वर्षे राहणार अंबुजा वाडी इगतपुरी घोटी नाशिक; बाळू भिकाजी काळे वय 46 वर्षे राहणार बोटा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर; शिवाजी शंकर कुरकुटे वय 64 वर्षे राहणार कुरकुटेवाडी, बोठा, संगमनेर जिल्हा अहमदनगर; बाळू गुलाब सर्वडे 41 वर्षे राहणार गुंजाळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर सो यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी पृथ्वीराज ताटे, पो. स. इ. विनोद धुर्वे, पो शि/ 2836 केंद्रे, पो शि/ 2686 काठमोरे, मपोशि/2681 बांगर, मापोशी/ दरवडे यांचे पथकाने केलेली आहे.
तरी अशा प्रकारे फसवणूक झालेल्या तरुणांना या द्वारे आवाहन करण्यात येते की, आपण पुढे येऊन आपल्या विरुद्ध झालेल्या अन्यायाबाबत पोलीस ठाण्यास माहिती द्यावी.