Saturday, April 20, 2024
Homeराजकारण‘प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही’ - राज...

‘प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही’ – राज ठाकरे

मुंबई : काही दिवसांपुर्वी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून मेंढ्या वळण्यासाठी आदिवासी चिमुकल्याची ३ ते ५ हजारात खरेदी-विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या संदर्भातील बातम्या माध्यमांमध्ये छापून देखील आल्या होत्या. या प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत आपली भुमिका मांडली आहे.

राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढे राज ठाकरे यांनी म्हटले आहे कि, राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या सोबतच ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा, असंही त्यांनी केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय