कोल्हापूर, 16 जून : ‘मुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे. मराठा आरक्षण विषय पुन्हा पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी ‘अस परखड मत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मत मांडलं. ते आज मराठा आरक्षण आंदोलनात कोल्हापूर येथे बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांनी ठरवलं तर नक्कीच मराठा आरक्षण मिळू शकतं’ असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनात छत्रपती शाहू यांनी आपली भूमिका मांडत मराठा समाजाला लवकरात लवकर आंदोलन मिळाले पाहिजे, अशी मागणी केली आहे.
‘एकाच व्यक्तीने हे घडवून आणणे हे शक्य नाही. यासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. राज्यातील 48 खासदारांनी दिल्लीत आवाज वाढवला पाहिजे. केंद्रात बहुमतात सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विषय मांडावा लागणार आहे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी. कायदेशीर लढाईपेक्षा घटना दुरूस्ती केली तर हा विषय लवकर सुटू शकतो’, असंही छत्रपती शाहू म्हणाले.