जुन्नर (पौर्णिमा बुचके) : विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस आपल्या संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. हा उत्सव वाईटावर चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे.
त्याचप्रमाणे, भगवान राम यांनी या दिवशी रावणाचा वध केला होता. परंतु जिथे परस्त्रीचा अनादर केला गेला तिथे रामायण महाभारत घडलं पण परस्त्रीला मातेसमान मानून स्वराज्य घडू शकते. त्याच अखंड हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले फक्त पर्यटन स्थळ नसून पूजण्याचं ठिकाण आहे, कारण आपण म्हणतो गडांचा राजा आणि राजांचे गड हे आपली अस्मिता आहे. म्हणून दरवर्षी विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर शिवाजी ट्रेल ही संस्था “संस्कृती जपण्याचा आणि वारसा जोपासण्याचा” प्रयत्न करत असते व सदर संस्थे अंतर्गत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विविध गड किल्ल्यावर दुर्गपूजन आयोजित केले जाते.
या अनुषंगाने ‘सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स टीमकडे’ किल्ले शिवनेरीची एक महत्व पूर्ण मोहीम हाती देण्यात आली होती. सह्याद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्स महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात ट्रेक उपलब्ध करणारी टीम आहे, तसेच विविध पर्यटन विषयी विविध उपक्रम राबवत असतात ज्यात कि स्थानिक जनतेस रोजगार उपलब्ध करून देणाचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
सदर कार्यक्रमात सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले असून त्यात – दुर्गपूजन पार पडल्यानंतर आईसाहेब जिजाऊ यांची बाळ राजे शिवबांना शिकवण ही थीम नाटकाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच बरोबर ओव्या, पोवाडा, मर्दानी खेळ व किल्ले शिवनेरी इतिहासाला दुर्ग वाचनाद्वारे उजाळा देण्याचा प्रयत्न केला गेला. असा अनोखा आणि उल्लेखनीय कार्यक्रमाचे नियोजन करून दसरा साजरा करण्यात आला.