मुंबई : महान आदिवासी शेतकरी स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी किसान सभेच्या वतीने देशभर ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला आहे. जयंती दिनी बिरसा मुंडा यांना अभिवादन करून त्यांच्या क्रांतिकारक विचाराचे स्मरण करत १५ नोव्हेंबर रोजी देशभर १ लाख गावांत किसान सभेच्या झेंड्याचे ध्वजारोहण लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. १३ ते १६ डिसेंबर २०२२ या काळात त्रिचुर, केरळ येथे होत असलेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या ३५ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या प्रचार कार्याची ही सुरुवात असेल, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
बिरसा मुंडा यांनी भारताची जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी आणि परकीयांचे आक्रमण व पारतंत्र्य रोखण्यासाठी अभूतपूर्व संघर्ष केला. आज जेव्हा पुन्हा एकदा कॉर्पोरेट कंपन्या व कॉर्पोरेटधार्जिणे भाजप सरकार आदिवासींच्या जगण्याच्या अधिकारांवर आक्रमण करत राष्ट्राची संपत्ती असलेले जल, जंगल, जमीन ओरबाडत आहे व आदिवासींना ते कसत असलेल्या जमिनींवर मालकी नाकारून त्यांना जंगलातून बेदखल केले जात आहे, असेही डॉ. अशोक ढवळे म्हणाले.
त्यामुळे अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांचा आदर्श समोर ठेवत पुन्हा संघर्ष करणे अटळ झाले आहे. किसान सभा त्यांचा हा संघर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे. १५ नोव्हेंबर रोजी देशभर १ लाख गावांमध्ये ध्वजारोहण करून ही लढाई मजबूत केली जाणार आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिरसा मुंडा जयंती दिनी किसान सभा देशभर करणार ध्वजारोहण!
संबंधित लेख