पुणे : राज्यातील 10 वी ची निकाल लागल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती होती. परंतु यात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आता उच्च न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी रद्द केल्यानंतर शिक्षण विभागाकडून अकरावीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती या महापालिका क्षेत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे तर राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालयीन पातळीवर प्रवेश प्रक्रिया करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ट्विट करून दिली आहे.
विद्यार्थ्यांना आज पासून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून प्रवेशासाठी च्या अर्जाचा पहिला भाग भरून प्रवेशासाठी नोंदणी करायची आहे. या अर्जाचा दुसरा भाग येत्या 17 ते 22 तारखे दरम्यान भरायचा आहे. महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी 27 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात 30 ऑगस्टपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी 30 ऑगस्ट लाच रिकाम्या जागांची यादी जाहीर केली जाणार आहे.
यंदाच्या दहावीच्या अंतर्गत निकालात विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळाले असल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विशेष चुरस असणार आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयीन प्रवेशासाठी दरवर्षी आवश्यक असणारे पात्रता गुण ( कट आॅफ) यंदा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
– संपादन : आरती निगळे