मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक लॉकडाउन लागू केला आहे. त्यासोबतच राज्यभरात मोठ्या प्रमाणावर ४५ वर्षा वरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आता १ मे पासून १८ ते ४५ वर्षा वरील व्यक्तींना लसीकरण देण्यात येणार आहे. मात्र १८ ते ४५ वर्षावरील नागरिकांना लस मोफत दिली जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
अखेर राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
केंद्रसरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे.
कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील होकार दिला असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.