मध्यप्रदेश : मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे आपल्या शेजाऱ्यांना कंटाळलेल्या एका ब्राह्मण कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली आहे. या कुटुंबामध्ये एकूण २५ सदस्य आहेत. या सर्व व्यक्तींनी आपण इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार करत असल्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे वृत्त न्यूज १८ आणि लोकसत्ताने दिले आहे.
यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत अनेक अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे. हे पत्र सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं आहे. ग्वाल्हेरमधील अपागंज येथे राहणारं हे ब्राह्मण कुटुंब शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबाला कंटाळलं आहे. या ब्राह्मण कुटुंबातील प्रमुखाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत ग्वाल्हेर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. या ब्राह्मण कुटुंबाला त्यांचे शेजरी कायम एससी – एसटी कायद्याअंतर्गत तुम्हाला अडवू अशी धमकी देत असल्याचं पत्रात म्हटलं आहे. त्यामुळेच आता आम्हाला इस्लाम धर्म स्वीकारुन मुस्लीम बनण्याची परवानगी द्यावी कारण आता आम्हाला मुस्लिमच मदत करु शकतात, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
ग्वाल्हेरमधील आपागंजमधील पूजा विहार कॉलीनीमध्ये राहणाऱ्या शर्मा कुटुंबाने ही तक्रार केलीय. शर्मा कुटुंबात २५ सदस्य आहेत. कुटुंबप्रमुखांनी केलेल्या आरोपांनुसार शेजरी राहणारे उमरैया कुटुंबिय त्यांना फार त्रास देतात.
या रोज रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर शर्मा कुटुंबियांनी ९ जुलै रोजी यासंदर्भात पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलं आहे . यामध्ये त्यांनी आमच्या कुटुंबातील २५ सदस्य हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार करत आहोत, असं म्हटलं आहे. कुटुंबप्रमुखांनी या पत्राची एक प्रत ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह आणि पोलीस अधिक्षक अमित सांघीसहीत इतर काही अधिकाऱ्यांनाही पाठवलीय.
धर्मांतर करण्याची धमकी देणारं हे पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. स्थानिक पोलिसांनी शर्मा कुटुंबातील प्रमुख व्यक्तीना चर्चेसाठी बोलवून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पोलिसांनी त्यांना शब्द दिला की तुमच्याविरोधात तक्रार आली तरी संपूर्ण प्रकरणाचा तपास करुन काय खोटं काय खरं याची चाचपणी केल्याशिवाय एफआयआर दाखल केली जाणार नाही. नंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांना पोलीस स्थानकामध्ये बोलवून त्यांची समजून घातली.