पिंपरी, दि.१५ : केंद्रामध्ये गेली सात वर्ष भाजपाचे सरकार आहे. तसेच भारतात अनेक राज्यात भाजप विरोधी सरकार आहेत. केंद्र सरकार भाजप विरोधी सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये राजकीय कुटील हेतूने कृत्रिम भाववाढ करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर भाजप विरोधी राज्यांमध्ये महागाईने कळस गाठला आहे. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त होत असल्याची टीका पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली आहे.
सामान्य नागरिकांना रोज वाढत जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीमुळे जगणे मुश्किल झाले आहे. नागरिकांचा हा आक्रोश केंद्र सरकारच्या कानी जावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने १४ ते २९ नोव्हेंबर पर्यंत राज्यभर जनजागरण अभियान सुरु केले आहे. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने शहरभर पदयात्रा, कोपरा सभांचे आयोजन केले आहे अशी माहितीही पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली आहे.
या जनजागरण अभियान अंतर्गत रविवारी (दि.१४ नोव्हेंबर) रोजी नेहरुनगर, पिंपरी येथील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच चिंचवड स्टेशन येथील आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप सोमवारी दि. २९ नोव्हेंबर रोजी भव्य सभेने करण्यात येणार आहे.