Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Alandi : पालखी सोहळा काळात वारकऱ्यांना सेवा सुविधांसाठी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

येत्या आषाढी पायी वारीची नियोजन पूर्व आढावा बैठक (Alandi)

पुणे (अर्जुन मेदनकर) – येत्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सेवा आदी सेवा सुविधा योग्य त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यास सर्व शासकीय यंत्रणांनी आता पासूनच नियोजन करावे. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. (Alandi)

श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा नियोजना साठी आयोजित संवाद बैठकीत पुणे जिल्हाधिआरी डूडी बोलत होते. या बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आदी उपस्थित होते. (Alandi)

पालखी सोहळा नियोजनाच्या अनुषंगाने यंत्रणांना तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी ही बैठक लवकर आयोजित करण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र देहू संस्थान च्यावतीने करण्यात येणाऱ्या सूचनांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. बैठकी दरम्यान दिलेल्या निर्देशां नुसार कार्यवाहीचा अहवाल संबंधित यंत्रणांनी मे महिन्या तील पुढील बैठकीत सादर करावा. आरोग्य सुविधा, शौचालये, पाणी पुरवठा आदी सर्व सुविधा गेल्या वर्षी पेक्षा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ई-टॉयलेट्सचे माध्यमातून संनियंत्रण करण्यात येणार आहे. यासाठी क्यूआर कोडद्वारे नागरिक, भाविक स्वच्छतेची मागणी करू शकणार आहेत. यासाठी तक्रार प्राप्त होताच निरसन करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

यावर्षी वारी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात फिरती ई- टॉयलेट्स ठेवण्यात येणार आहेत. त्यांची स्वच्छता, पाण्याचा पुरवठा होत आहे किंवा कसे आदी संनियंत्रण करण्याची वेगळी व्यवस्था व पथक नेमण्यात येणार आहे.

यासाठी त्याचे एक मोबाईल ॲप तयार करण्यात येणार आहे. ही मोबाईल स्वच्छतागृहे ठेवण्यात आलेल्या ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात येणार आहेत. ज्या वरुन अस्वच्छ स्वच्छतागृहांची छायाचित्रे काढून अपलोड करता येतील. ते प्रशासनास प्राप्त होतील व त्यानुसार स्वच्छते बाबत नियोजन तात्काळ करणे शक्य होणार आहे. वेगवान मोबाईल नेटवर्क साठी बूस्टर लावण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी आळंदी येथील दर्शनबारीच्या अनुषंगाने जमीन आरक्षण, पालखी मार्गस्थ असताना वाहतूक कोंडी होऊ नये, स्वागतासाठी लावण्यात येणारे ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक, पालखी मार्गस्थ असताना तसेच पाण्याचे टँकर भरण्याच्या ठिकाणी अखंड वीजपुरवठा, भारतीय राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने पालखी महामार्गाची अपूर्ण कामे करून घेणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारक्षेत्रातील रस्त्यांची डागडुजी आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. पालखी सोहळ्यात कोणत्याही घटनेच्या अनुषंगाने संपर्क साधण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीस जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विक्रमसिंह मोरे, वैभव मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, पुणे शहरच्या प्रांताधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, खेड प्रांताधिकारी अनिल दौंडे, हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने, दौंड प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, वारकरी महामंडळ उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, महानगरपालिका, नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलीस, एनडीआरएफ, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles