समाजाची अवस्था फुटलेल्या आरशासारखी
पिंपरी चिंचवड, दि. २७ : देशातील सर्वात कठीण काळ आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि औद्योगिक गती कोरोना महामारीमुळे कोसळली आहे. महामारी कधी थांबेल हे सांगता येत नाही. सलग दोन वर्षे काबाडकष्ट करून रोजंदारीवर जगणाऱ्या हाताना पुरेसे काम राहिले नाही, स्वयंपाक घरातील किराणांचे डबे मोकळे आहेत. चूल कशी पेटवायची या चिंतेने घरकाम करणाऱ्या माता भगिनींच्या डोळ्यातील आसवे पाहून दुःख होत आहे. समाजातील धनवंत लोकांनी ओंजळ भरून अन्नदान केले तर ईश्वराचे दर्शन आसपास होईल. महिला संघटनेच्या धान्यबँकेला समृद्ध नागरिकांनी दान द्यावे, असे आवहान बाबुराव घोलप विद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.वंदना पिंपळे यांनी आकुर्डी येथे सांगितले.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या धान्य बँकेला प्रा.डॉ.वंदना पिंपळे यांनी धान्य दान करतेवेळी त्या बोलत होत्या. त्यावेळी घरेलू महिलांना शिधावाटप करण्यात आला. अध्यक्षस्थानी अपर्णा दराडे होत्या.
पुढे बोलताना पिंपळे म्हणाल्या, गरिबीतून उच्च शिक्षण घेताना आकुर्डी गावात गाई म्हशी पाळून वडील बाजीराव काळभोर यांनी दूध विकून आम्हाला शिक्षण दिले. गरिबी आम्ही लहानपणी पहिली आहे, ती गरिबी या शतकात आजही वेगळ्या स्वरूपात आहे. आज गरीब आणि श्रीमंत अशी मोठी दरी आहे. त्या काळातील गरिबाला गाव सांभाळत होत. आता समाज पूर्वीसारखा संवेदनशील राहिला नाही, समाजाची अवस्था फुटलेल्या आरशासारखी झाली आहे.
जनसेवा हीच ईश्वरसेवा म्हणणे सोपे असले तरी, सेवा करणे ही सर्वांसाठी साधारण कार्य नाही, हे अतुलनिय कार्याचा मनापासून विचार करायला हवा. पण, सर्वांसाठी नाही. कित्येक जण आपले व आपल्या परिवाराचे पालन, पोषण कसे करायचे या विवंचनेत असतात. मानव जन्माला आला की, जगण्यासाठी कमवतो आणि पोटाचा अग्नी शमवतो. महिला आणि युवक संघटनेतील संवेदनशील कार्यकर्ते शहरातील गरीब वस्त्यांमध्ये काम करतात, त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे.
माझ्यावर आजही शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार आहेत. तुमच्या धान्य बँकेला आणि शिधा वाटपाच्या या देवकार्यत मला सहभागी व्हायची संधी मिळाली त्यामुळे खूप आनंद होत आहे, असेही पिंंपळे म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतिकुमार कडुलकर यांनी केले.यावेळी गणेश दराडे, दिलीप पेटकर, अंजली पुजारी, स्वप्निल जेवळे, गुलनाझ शेख, अमिन शेख, गौरव पानवलकर,शेहनाज शेख, मंगल डोळस यांनी कर्यक्रमाचे संयोजन केले.