नागपूर (प्रतिनिधी) : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सिटू) नागपूर जिल्हा कमिटीच्या वतीने कॉटन मार्केट चौक ते आग्याराम चौक दरम्यान मानव साखळी तयार करून चेतावणी आंदोलन करण्यात आले.
मागील १६ सप्टेंबर रोजी आशा वर्कर्सचे मानधनात २००० वाढीचा आदेश काढला असताना आतापर्यत मोबदला दिला गेला नाही. गटप्रवर्तक बाबत कोणताही निर्णय मागील सरकार किंवा सध्याच्या सरकारने घेतला नाही.त्यामुळे आशा वर्कर्स व गटप्रवर्तक निराश आहेत. कोरोना संकटात आशा व गटप्रवर्तक यांची भूमिका ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ची आहे. हे संपूर्ण देशाला कळले आहे. त्यानंतर सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र आशा – गटप्रवर्तक कृती समितीच्या आवहानानुसार ३ जुलै २०२० पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
संघटनेने ३० जून पर्यंत निर्णय झाला नाहीतर संप अटळ आहे, अशी भूमिका घेतली आहे.त्याचा भाग म्हणून राज्यभर चेतावणी आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी म्हटले आहे.
आशा व गटप्रवर्तकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, आशाला १० हजार रुपये व गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन द्या, कोरोना काळात ३०० रुपये रोज मिळाले पाहिजे, एपीएल / बीपीएल अट रद्द करून सरसकट ३०० रुपये द्या, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना सन्मान जनक वागणूक द्या आदी मागण्यांचे फलक हाती घेऊन नागरिक व सरकारचे लक्ष वेधून घेले.
यावेळी राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, मनीषा बारस्कर श, अंजू चोपडे, कल्पना हटवार, मंदा गंधारे, पौर्णिमा पाटील, रुपलता बोंबले, नंदा लिखार आदीसह शेकडो आशा वर्कर्स सहभागी झालेल्या होत्या.