![]() |
मानी येथे विहरीवर डिझेल इंजिन वापरून सुरू असलेले भात लागवड |
सुरगाणा (दौलत चौधरी) : पावसाने दडी मारल्याने परिसरात भात लावणी खोळंबली आहे, मागील महिन्यात समाधानकारक पाऊस झाला होता, त्यामुळे भात उत्पादन शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण होते, मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने भाताची तयार झालेले कोवळी रोपे वाया जाण्याची भीती आहे.
सुरुवातीला पेरणी झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती, त्यामुळे भात बियाण्याची उगवण क्षमता घटली होते, काहींना दुबार पेरणी करावी लागली होती. तालुक्यात कोरडवाहू शेतकरी हा खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो पुरेसा पाऊस पडला नाही, तर खरीप हंगाम वाया जाऊ शकतो तालुक्यात एकूण लागवड क्षेत्र तेरा हजार शंभर हेक्टर असून पैकी साधारण दोन हजारावर जेमतेम लागवड करण्यात आले आहे.
अठरा हजार हेक्टर क्षेत्र अजूनही लागवडीसाठी शिल्लक आहे, कोरडवाहू शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. नागली साडे आठ हजार हेक्टर, खुरसनी साडे तीन हजार हेक्टर, उडदाचे दीड हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी आहे, भाताची इंद्रायणी, दप्तरी, आर 24, कोळपी, 312, खडसी, गर्वाबंगाल, रूपाली, यासह हायब्रीड एक काडी या भाताच्या वाणीचे लागवड केली जाते, ज्या शेतकऱ्यांना नदी, नाले, तलाव, विहीर, कुपनंलिका, याद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी थोड्याफार प्रमाणात लागवड केली आहे, बाकीचे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.