जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात भात पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अतिवृष्टीमुळे भात पिकाचे नुकसान झाले असतानाच कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
तालुक्यात डोंगराळ व दुर्गमभागात आदिवासी ६५ गांवे असून त्या भागामध्ये खरीप हंगामात भात हे मुख्य पीक आहे. पावसावर अवलंबित्व असलेल्या शेतीमुळे रब्बी हंगामात कमी प्रमाणात पीक घेतले जाते.
भात हे मुख्य पीक असलेल्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये अति पाऊस झालेने हाता तोंडाशी आलेले पिक निसवण्याच्या तयारीत असताना कडा करपा, खोडकिडा, लष्कर आळी या रोगामुळे शेतकरी संकटात आला आहे.
यामुळे भात पिक उत्पनामध्ये ४० ते ५० टक्के घट होण्याची दाट शक्याता आहे. काही प्रमाणात भाताच्या लोंब्या व आलेले दाणे पावसामुळे कुंजून काळे पडलेले आहे.
गेल्या वर्षी सुध्दा अतिवृष्टी, कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईचे फॉर्म भरले गेले, परंतु नुकसान भरपाई मिळाले नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या वर्षीही अतिवृष्टी, कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात सापडला असून पंचनामे करुन नुकसान भरपाईची मागणी आता जोर धरत आहे.