अहमदनगर, दि.०६ : अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी शॉकसक्रिटमुळे आग लागली. यामध्ये दहा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटर वरून दिली आहे.
या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 6, 2021
दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, त्यांनी म्हटले होते की, नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.