पिंपरी चिंचवड : अजमेरा रोड म्हाडा कॉलनीतील समतावादी विचारांच्या सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी प्रसाद रासकर यांचा पारगाव, खंडाळा, सातारा (दि.२१ नोव्हेंबर) येथे सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२१ स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, फुले विचार अभियान मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
रोहिणी रासकर यांनी कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना कपडे, औषधे याची मदत केली आहे. कोरोना काळात अन्नदान केले. गेली काही वर्षे महिलामध्ये सावित्रीबाई फुले विचारांच्या ओव्या गायनाचे कार्यक्रम करतात. विधवा, घटस्फोटित महिलांचे पुनर्विवाहातून पुनर्वसन करत आहेत. मतिमंद, अपंग मुलांसाठीच्या शासकीय योजना अर्ज भरणे, रोजगार माहिती केंद्राच्या माध्यमातून गरजूना नोकरीच्या संधी त्या मिळवून देत आहेत. माळी समाज आणि सर्व जातीधर्माच्या विवाह नोंदणी केंद्रामार्फत त्याचे सामाजिक कार्य सुरू आहे.
सामजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
पुणे येथे कॉलेजचे प्राचार्य मेजर थॉमसकॅंडी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, महात्मा फुले यांचा पुणे विश्रामबाग येथे सरदार व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत दिनांक १६ नोव्हेंबर १८५२ रोजी शालजोडी देऊन सत्कार केला होता. या स्मृती दिनाच्या १६९ व्या संस्मरणीय दिन खंडाळा येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संपतराव जाधव अध्यक्ष भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती यांचे हस्ते रोहिणी रासकर यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे अष्टविनायक ग्लासचे दीपक शिर्के, गुरुकुल विद्यालयाच्या मुख्याध्यपिका प्रिया ननावरे, सामाजिक कार्यकर्त्या, माळी सेवा संघाचे अध्यक्ष दत्तात्रय माळी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व अभिवादन उपस्थितीत मान्यवरांनी व फुलेंप्रेमींनी केले, सावित्रीबाईच्या ओवीचे गायन गुरुकुल मधील विद्यार्थिनींनी केले. महात्मा फुले विचार अभियान यशोगाथा व अभियानातील कार्याचा आढावा संयोजक अजित जाधव संचालक सुजन मल्टिपल निधी लिमिटेड यांनी प्रास्ताविक केले.